Latest NewsMaharashtra

राज ठाकरेंचा सरकारला ‘खुल्लं आव्हान’: “तुमच्या लोकांवर कारवाई करा, नाहीतर…”

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडणे अपेक्षित असणाऱ्या विधिमंडळाच्या परिसराला गुरुवारी अक्षरश: आखाड्याचे स्वरूप आले. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार Jitendra Awhad यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला गेला. दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या समोर उभे ठाकले आणि अगदी मारहाणीपर्यंत हे प्रकरण गेले. या राड्यानंतर आता मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांनी सरकारला आपल्या लोकांवरही कारवाई करण्याचं आव्हान दिलं असून ही कारवाई होणार नसेल तर नंतर आम्हाला अक्कल शिकवायला जावू नका, असा इशारा दिला आहे.

“सरकारला माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्यांना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका,” असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिलं आहे.

विधानभवनातील राड्याबद्दल संताप व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, “काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, काय अवस्था झालीय आपल्या महाराष्ट्राची? सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे वाट्टेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं, त्या लोकांचा वापर इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गलिच्छ शेरेबाजी करण्यासाठी करायचा आणि पुन्हा राजकीय साधनशुचितेच्या गोष्टी बोलायच्या हा भंपकपणा आता तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आला असेल असं मी मानतो. मी तर मराठी जनतेलाच विचारेन, ‘कोणाच्या हातात दिला आहेत महाराष्ट्र?’ असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेलाही सवाल विचारला आहे.”मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्याच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसलेत? जेव्हा मराठी भाषेला किंवा मराठी माणसाच्या गळ्याला कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर माझा महाराष्ट्र सैनिक त्या व्यक्तीला दणका देतो, याचा मला अभिमान आहे कारण ते कृत्य हे व्यक्तिगत हेव्यादाव्यातून येत नाही तर ते माझ्या भाषेसाठी आणि माझ्या मराठी माणसासाठी असतं. माझ्या दिवंगत आमदाराने पण विधानभवनात एका मुजोर आमदाराला दणका दिला होता, तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हता तर मराठीला कमी लेखायचा प्रयत्न केला होता म्हणून. पण यांचं काय?” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी Vidhanbhavan Rada प्रकरणी आपला राग व्यक्त केला आहे.

अधिवेशनाच्या उद्देशावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

राज ठाकरे यांनी अधिवेशनाच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलंय की, “अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी, एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे? महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाही, सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” अशी भीती राज यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, “माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की, या भंपक प्रकारणांमध्ये तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका,” असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button