अमरावती: पुर्णा प्रकल्पात विसर्गाची शक्यता, नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा इशारा

चांदूर बाजार : अमरावती जिल्ह्यातील पुर्णा मध्यम प्रकल्पातील जलपातळी वाढल्याने आज सकाळपासून प्रशासन सतर्क झालं आहे. जलाशयाची पातळी आज दिनांक ०५ जुलै रोजी सकाळी ७:०० वाजता ४४८.१५ मीटर वर पोहोचली असून, सध्या प्रकल्पात २०.२३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५७.२०% पाणीसाठा झाला आहे.
पाणीसाठा धोरणानुसार, पुढील चार तासांनंतर म्हणजेच सुमारे दुपारी ११ वाजल्यापासून प्रकल्पातून नदी पात्रात नियंत्रीत विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून, सर्व यंत्रणांना तत्पर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा:
“पुर्णा मध्यम प्रकल्प पुर नियंत्रण कक्षातर्फे सर्व संबंधित यंत्रणांना आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. कृपया नदीपात्रात माणसे, गुरेढोरे, बोटी किंवा कोणतेही उपक्रम राबवू नयेत.”
- महत्त्वाच्या सूचना:
नदीपात्राजवळील गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. - बालकांना, गुरेढोऱ्यांना नदीपात्रापासून दूर ठेवावे.
- संभाव्य वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे सुरक्षेची खबरदारी घ्यावी.



