प्रहारचे जलसमाधी आंदोलन यशस्वी – उमरखेड ते करोडी रस्त्याच्या कामास लेखी आश्वासन
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड ते करोडी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था, नागरिक व शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याशी निगडित झालेली दु:स्थिती, याच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाची धार तीव्र करत पैनगंगा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन छेडले. शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रस्त्याचे दैन्य – जनतेचे हाल
उमरखेड-करोडी मार्ग हा करोडी, पेवा, येळम, काळेश्वर परिसरातील नागरिकांचा मुख्य दळणवळण मार्ग आहे. या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे दररोज विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांचे प्राण आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न धोक्यात येत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था इतकी बिकट होते की रुग्णवाहिका अडकतात, महिलांची प्रसूती रस्त्यातच होते, आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
पैनगंगा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन
या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड शहरप्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसह पैनगंगा नदीच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. नागरिकांचा आवाज ऐकून अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दुधे यांनी एक जानेवारी 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
प्रहारचा इशारा – वेळेत काम न झाल्यास आंदोलन तीव्र
शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी इशारा दिला आहे की, जर हे काम 1 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण झाले नाही, तर 26 जानेवारीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे संपूर्ण कार्यालय ताब्यात घेण्याचे आंदोलन करण्यात येईल.



