राठी नगरमध्ये शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; गाडगेनगर पोलिसांकडून तपास सुरू
अमरावती : शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राठी नगरमध्ये एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ५६ वर्षीय गोपाल बाबासाहेब राणे या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ही घटना आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार गोपाल बाबासाहेब राणे हे राठी नगरचे रहिवासी होते आणि शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवत होते. दररोज सकाळी ते पत्नीच्या सोबत मॉर्निंग वॉकसाठी जात असत. मात्र आज सकाळी वॉकनंतर त्यांनी पत्नीला सांगितले की, “मला काही लिहायचं आहे, मी आईवडिलांच्या बाजूच्या घरात जातो.” त्यानंतर त्यांनी तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच गाडगे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व पंचनामा केला. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
गोपाल राणे यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
गाडगेनगर पोलिसांनी आत्महत्येच्या घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
प्रतिनिधी : नितेश किल्लेदार



