पिंपरी चिंचवडचे ३ मित्र राजस्थानमध्ये भीषण अपघातात ठार; दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर दुर्घटना

पिंपरी चिंचवड शहरातील तीन तरुणांचा राजस्थानात भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हे तिघे मित्र २७ फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी राजस्थानला गेले होते. मात्र परतीच्या प्रवासात दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे वर त्यांच्या फॉर्च्यूनर कारचा भीषण अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की आलिशान फॉर्च्यूनर कारचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात कारमधील तिन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा पसरली आहे.
मृत तरुण हे थेरगाव, वाकड आणि महाळुंगे परिसरातील असल्याची माहिती समोर येत आहे. ते मित्रांच्या ग्रुपसोबत परराज्यात फिरण्यासाठी गेले होते. या ग्रुपमध्ये तीन फॉर्च्यूनर गाड्या होत्या, त्यापैकी एका गाडीला हा भीषण अपघात झाला.
अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले असून अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



