स्वच्छतेच्या प्रश्नावरून अमरावतीत अनोखे आंदोलन; स्वच्छता अधिकाऱ्यांचा उपरोधिक सत्कार

अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेवरून नागरिक आणि जनप्रतिनिधींचा संताप उफाळून आला आहे. प्रभाग क्रमांक १ शेंगाव–रहाटगाव रोड परिसरात साफसफाई होत नसल्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी स्वच्छता अधिकाऱ्यांचा उपरोधिक सत्कार करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
अमरावती महानगरपालिकेकडून शहरातील साफसफाईचा ठेका कोणार्क कंपनीला कोट्यवधी रुपयांत देण्यात आला आहे. मात्र तरीही अनेक प्रभागांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप नागरिक आणि जनप्रतिनिधींनी केला आहे.
प्रभाग क्रमांक १ शेंगाव–रहाटगाव रोड परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर नगरसेवक आणि नगरसेविकांनी स्वच्छता अधिकारी डॉ. अजय जाधव यांना घटनास्थळी बोलावले.
यानंतर नगरसेवक गुड्डू धामाले, चंदू खेडकर तसेच नगरसेविका वंदना मडगे आणि कल्याणी तायडे यांनी अधिकाऱ्यांना माळ घालून आणि फुलांची उधळण करून उपरोधिक सत्कार केला.
जनप्रतिनिधींनी स्पष्ट केले की हा सन्मान नसून प्रभागातील खराब स्वच्छता व्यवस्थेविरोधातील आंदोलन आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचलेले असून दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
दरम्यान, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
अमरावती शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून नागरिक आणि जनप्रतिनिधींच्या आंदोलनानंतर प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



