पार्टीच्या बहाण्याने मित्रांनी केली BBA विद्यार्थ्याची हत्या; बहिणीच्या लग्नाआधीच निघाली अर्थी

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुट्ट्यांसाठी घरी आलेल्या बीबीएच्या विद्यार्थ्याची त्याच्या मित्रांनीच गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत विद्यार्थ्याची ओळख निलेश कुमार अशी असून तो काशी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा बीबीएचा विद्यार्थी होता. निलेश सुट्ट्यांसाठी घरी आला होता आणि शनिवारी परत शिक्षणासाठी जाणार होता. मात्र त्याआधीच त्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
ही घटना समस्तीपूर जिल्ह्यातील विद्यापतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मऊ धनेशपूर गावात घडली.
मृतकाचा चुलत भाऊ शिवम कुमार याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेएकच्या सुमारास निलेशचे मित्र हिमांशू आणि हरिओम (रा. शेरपूर) यांनी त्याला पार्टीच्या बहाण्याने घरातून बाहेर बोलावले.
खाण्या-पिण्याच्या पार्टीदरम्यान काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपींनी निलेशवर गोळी झाडली.
गोळी लागल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या निलेशला आरोपींनी एका खासगी रुग्णालयाजवळ टाकून फरार झाले.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, बहिणीच्या लग्नाआधीच घरात अंत्यसंस्काराची वेळ आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मित्रांनीच केलेल्या या हत्येमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.



