चिखलीत भीषण आग; ६ ते ७ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जयस्तंभ चौक परिसरात दुपारी लागलेल्या आगीत सहा ते सात दुकाने जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जयस्तंभ चौक परिसरात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली.
आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत सहा ते सात दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
यामध्ये दोन कृषी केंद्र, एक वडापाव सेंटर, दोन भेळ गाडी सेंटर, एक घड्याळ दुरुस्ती सेंटर आणि एक फळ-फ्रूट सेंटर यांचा समावेश आहे.
दुकानांमधील सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले असून लघुउद्योजकांचे अंदाजे ६० ते ७० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, चिखली पोलीस स्टेशन, तहसील प्रशासन तसेच स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
चिखली शहराच्या मध्यवर्ती भागात लागलेल्या या भीषण आगीमुळे लघुउद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



