इस्लापूर मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग; ४ ते ५ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील मुख्य मार्केट परिसरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चार ते पाच दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर मार्केट परिसरात मध्यरात्री अचानक आग लागली.
काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण करत परिसरातील चार ते पाच दुकाने भस्मसात केली.
या आगीत हार्डवेअर दुकान, हॉटेल तसेच चपलांच्या दुकानांसह इतर काही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली.
आगीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांची मालमत्ता आगीत नष्ट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
मध्यरात्री लागलेल्या या भीषण आगीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आग लागण्यामागील नेमके कारण काय, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.



