एलपीजी संकटावर राहुल गांधींचा सरकारवर निशाणा; “अजून वेळ आहे, धोरणे सुधारावीत”

नवी दिल्ली :
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी देशातील गॅस आणि इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या धोरणांवर कडक टीका केली. भारताच्या त्रुटीपूर्ण परराष्ट्र धोरणामुळे देशाची ऊर्जा सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील तेल आणि गॅस परिस्थितीवर सभागृहात बोलण्याची त्यांना परवानगी देण्यात आली नाही. या मुद्द्यावर बोलण्यासाठी त्यांनी वेळ मागितला होता, मात्र त्यांना संधी नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संसदेतील नव्या प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सामान्यतः सभागृहात बोलण्यासाठी सदस्य परवानगी मागतात आणि त्यांना वेळ दिला जातो. मात्र आता विरोधी पक्षनेते कधी बोलणार हे मंत्री ठरवतात. हे लोकशाहीसाठी योग्य नाही,” असे राहुल गांधी यांनी म्हटले.
दरम्यान, देशातील वाढती एलपीजी व इंधन टंचाई आणि ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारने तातडीने योग्य निर्णय घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.



