दिल्लीतील रिठाला झोपडपट्टीत भीषण आग; ५० पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :
दिल्लीतील रिठाला परिसरातील झोपडपट्टीत गुरुवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे ५० पेक्षा अधिक झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे साडेचारच्या सुमारास आग लागल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. झोपड्यांमध्ये वेगाने पसरत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे १६ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या.
या आगीत अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र आग लागल्यानंतर एका मुलीचा पत्ता लागलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली असून तिचा शोध सुरू आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग लागल्याची माहिती मिळताच पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. आगीने अनेक झोपड्यांना आपल्या विळख्यात घेतले होते.
प्राथमिक माहितीनुसार या परिसरात ५० पेक्षा अधिक झोपड्या होत्या, त्यापैकी अनेक झोपड्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्या. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवले असून सकाळी साडेसहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.



