आदिवासी कोळी समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन; अमरावतीतून शासनाला निवेदन

अमरावती :
आदिवासी कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत आदिवासी कोळी महासंघ यांच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरावतीतून निवेदन सादर करण्यात आले आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या आदिवासी कोळी महासंघाने समाजाच्या विविध प्रश्नांबाबत शासनाकडे ठोस भूमिका मांडली आहे. अमरावती येथील विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या पत्र क्रमांक ६५२९१११/प्र.क्र. तसेच संदर्भीय सूचना क्रमांक २२८५/२०२६ चा उल्लेख करण्यात आला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, आदिवासी कोळी समाजाच्या हक्कांबाबत शासनाला चुकीची किंवा विसंगत माहिती जाऊ नये, यासाठी अधिकृत कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.
दरम्यान, २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनाचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. समाजातील युवक-युवतींच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध शासकीय योजनांचा योग्य लाभ मिळावा, ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे प्रतिनिधी उमेश ढोणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, असा ठाम आग्रह महासंघाने व्यक्त केला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई तसेच संबंधित विभागांचे प्रधान सचिव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
आता शासन या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
आदिवासी कोळी समाजाच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आंदोलनाची तीव्रता वाढण्यापूर्वीच शासनाने तोडगा काढावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.



