मेळघाटात महावितरणचा ‘करंट’; लाईनमनच्या चुकीने आदिवासी युवकाचा मृत्यू

अमरावतीच्या मेळघाटातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. महावितरणच्या एका लाईनमनचा बेजबाबदारपणा एका आदिवासी युवकाच्या जीवावर बेतला आहे. ‘तू खांबावर चढ, मी वीज बंद केली आहे’ असं सांगून एका अननुभवी युवकाला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आलं. मेळघाटातील दहेंद्री गावात नेमकं काय घडलं? का झाला एका तरुणाचा बळी?
मिळालेल्या माहितीनुसार, जारीदा सब-स्टेशन अंतर्गत येणाऱ्या या गावात वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी लाईनमन दुर्योधन वासनिक याने स्वतः काम करण्याऐवजी, गावातील तरुण पतिराम कासदेकर याला जबरदस्तीने वीज खांबावर चढवले.
कोणतीही सुरक्षा साधने नाहीत, हातात ग्लोव्हज नाहीत… ‘लाईट बंद केली आहे’ असं खोटं आश्वासन देऊन युवकाला खांबावर चढवलं आणि क्षणार्धात घात झाला! जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होताच पतिरामला जोरदार धक्का बसला आणि तो खाली कोसळला. रुग्णालयात नेईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.घटनेनंतर लाईनमन फरार झाला असून, कामचुकार कर्मचाऱ्याने माझ्या मुलाचा बळी घेतला’ असा टाहो कुटुंबियांनी फोडला आहे. आता गावकऱ्यांची एकच मागणी आहे – दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
“या घटनेने महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अधिकृत कर्मचारी नसताना एका तरुणाला जीव धोक्यात घालायला लावण्याचा अधिकार लाईनमनला दिला कुणी? सध्या चिखलदरा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत गावकरी मागे हटायला तयार नाहीत.



