भातकुलीत अपघाताचा बनाव उघड; १२ वर्षांच्या मुलाच्या हत्येचा छडा

अमरावती जिल्ह्यातील भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला रस्ता अपघात म्हणून नोंद झालेल्या घटनेत प्रत्यक्षात १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या झाल्याचे तपासात स्पष्ट झाले. चिकन खाण्याच्या किरकोळ वादातून चुलत भावानेच मुलाची हत्या केली आणि ती लपवण्यासाठी वडिलांनी अपघाताचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट…
२६ फेब्रुवारी रोजी अरुण गौड यांनी आपल्या १२ वर्षीय मुलगा जितेराजा गौड याचा अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलगा आणि पुतण्या बब्बू गौड पाणी आणायला जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली होती.
मात्र मृतदेहावरील जखमांचे स्वरूप संशयास्पद वाटल्याने भातकुली पोलीस स्टेशन यांनी तपासाची दिशा बदलली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक आणि सखोल चौकशी सुरू करण्यात आली.
कसून चौकशीदरम्यान धक्कादायक सत्य समोर आले — चिकन खाण्याच्या वादातून मृत जितेराजाचा चुलत भाऊ बब्बू गौड याने धारदार शस्त्राने हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वडील अरुण गौड यांनीच अपघाताचा खोटा बनाव रचला.
पोलिसांनी खुनाचे कलम वाढवून वडिलांना अटक केली आहे. मुख्य आरोपी बब्बू गौड जखमी अवस्थेत असून त्यालाही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रक्ताच्या नात्यांतून झालेल्या या निर्घृण हत्येचा गुंता भातकुली पोलिसांनी काही तासांत उकलला. या कारवाईबद्दल राकेश ओला आणि त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे.
किरकोळ वादाचे पर्यवसान इतक्या भीषण गुन्ह्यात होऊ शकते, यामुळे संपूर्ण अमरावती हादरले आहे.
अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा City News.



