नऊ कुलूपबंद घरांचे कडी-कोयंडे तोडले, २४ तास उलटूनही चोरटे मोकाट

अमरावतीत मोठी खळबळ उडवणारी घटना घडली, अमरावती शहरातील न्यायव्यवस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने शहराच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांची कुलूपबंद घरे फोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची ही धक्कादायक घटना आहे. घटनेला २४ तासांहून अधिक कालावधी लोटला असला तरी अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहर गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. चोरट्यांनी मागील बाजूने भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित चोरटे कैद झाले असून त्यांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे चोरटे परराज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारणपणे बाराशे किलोमीटर अंतरावरून अमरावतीत चोरी करण्यासाठी हे टोळकं आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शहर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत असून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे.
न्यायाधीशांच्या घरांवरच चोरी झाल्याने अमरावती पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक होते का… आणि शहरातील सुरक्षेबाबत कोणती ठोस पावले उचलली जातात… याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे…



