गो. से. महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

खामगाव : स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा विषय हा ‘उच्च शिक्षणात AI ची भूमिका’ असा होता. स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय सुखलालजी पिरामलजी झुंनझुनवाला यांच्या स्मृतिनिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे हे दहावे वर्षे होते. समाजातील ज्वलंत विषयावर महाविद्यालय विद्यार्थ्यांचे विचार जाणून घेता यावे या उद्देशाने दरवर्षीच नवीन अद्ययावत विषयाच्या अनुषंगाने,समाजाला दिशा देणारे विषय या स्पर्धेत ठेवण्यात येतात. महाराष्ट्रातील महाविद्यालय युवकांना हे विचार व्यक्त करण्याचे मोठे व्यासपीठ या निमित्ताने महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेले आहे. या स्पर्धेला राज्यभरातून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाषजी बोबडे यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर ,स्पर्धेचे समन्वयक प्रा. विक्रम मोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी स्वातंत्र्य सेनानी सुखलालजी झुनझुनवाला यांच्या कार्याचा विस्तृत आढावा डॉ. पृथ्वीराज ठाकूर यांनी प्रास्ताविक करताना घेतला स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. खामगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.त्यांना महात्मा गांधींच्या सहवास लाभला होता. असेही त्यांनी सांगितले. उच्च शिक्षणात AI ची भूमिका विस्तृतपणे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केली. आजचे जग हे अत्यंत वेगवान जग आहे. त्याला AI या तंत्रज्ञानाचा चांगला फायदा होतो आहेच.तसेच AI या तंत्रज्ञानाच्या आधीन माणसाने राहू नये. माणसाची कल्पकता नष्ट होऊ शकते.त्याला मानवी मूल्य समजत नाही. असेही या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेचे माजी उपाध्यक्ष मा. अशोकजी झुंनझुनवाला यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये ५००१₹ आणि प्रमाणपत्र ऐश्वर्या पाटील हिने जळगाव खान्देश येथील विद्यार्थिनी पटकविले. दुसरे पारितोषिक रूपये ३००१ आणि प्रमाणपत्र गो. से. महाविद्यालयाची विद्यार्थिनी मनस्वी मधुपवार हिला मिळाले. तिसरे पारितोषिक रूपय २००१ आणि प्रमाणपत्र वैष्णवी पाघृत हिने पटकविले, तर उत्तेजनार्थ पारितोषिक १००१ रुपये पल्लवी मारोडे या विद्यार्थिनीला मिळाले. या स्पर्धेचे निपक्षपाती मूल्यमापन डॉ. स्मिता तराळे, श्री पियुष वैराळे एआय तज्ञ, व डॉ. राजेंद्र वाघमारे यांनी केले होते.सूत्रसंचलन कु. गायत्री एकडे हीने केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे डॉ. आनंदजी झुंनझुनवाला स्पर्धेचे समन्वयक प्रा. विक्रम मोरे, प्रा. कैलास वैराळे, डॉ. डी. एन. व्यास, डॉ. शेखर खडसे, प्रा. संतोष वरणकार, समितीचे सर्व सदस्य विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. ही स्पर्धा ऐकण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.



