राजस्थानमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसचा भीषण अपघात; ४ ठार, ४४ जखमी

बांसवाडा (राजस्थान) — लग्नाचा आनंद शोकात बदलणारी भीषण घटना राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला असून ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना बांसवाडा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर कालिंजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटिया अंबा परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. सांडलाई गावातील एका तरुणाचे लग्न पार पडल्यानंतर वधू-वर वेगळ्या चारचाकी वाहनातून रवाना झाले, तर उर्वरित नातेवाईक आणि पाहुणे बसमधून परतत होते. त्याचवेळी उतारावर बस अचानक उलटली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना बांसवाडा येथील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंद्रजीत यादव आणि पोलिस अधीक्षक सुधीर जोशी यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



