कर्तव्यासाठी प्राणांची आहुती! २० चिमुकल्यांना वाचवण्यासाठी अंगणवाडी सेविका बनली ‘ढाल’; हृदयद्रावक शेवट

नीमच (मध्य प्रदेश): स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता दुसऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या वीरमातांच्या कथा आपण ऐकल्या असतील, पण मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात याची प्रचिती देणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अंगणवाडीत खेळणाऱ्या २० चिमुकल्यांवर मधमाशांनी भीषण हल्ला चढवला असता, अंगणवाडी मदतनीस कंचन बाई मेघवाल यांनी आपल्या शरीराची ढाल करून या मुलांचे प्राण वाचवले. दुर्दैवाने, या प्रक्रियेत शेकडो मधमाशांनी डंख मारल्याने कंचन बाईंचा मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना नीमच जिल्ह्यातील राणपूर (माडावाडा पंचायत) येथील अंगणवाडी केंद्रात घडली. नेहमीप्रमाणे मुले अंगणात खेळत असताना अचानक मधमाशांच्या एका मोठ्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. मुलांचा आरडाओरडा ऐकून स्वयंपाक करणाऱ्या कंचन बाई बाहेर धावून आल्या. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.
अशी बनली मुलांची ‘रक्षक’
मुलांना वाचवण्यासाठी कंचन बाईंनी आजूबाजूला पडलेल्या चटया आणि ताडपत्री उचलल्या. त्यांनी एकेका मुलाला ताडपत्रीत गुंडाळून सुरक्षितपणे इमारतीच्या आत नेण्यास सुरुवात केली. मधमाशा मुलांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून त्यांनी मुलांना स्वतःच्या मिठीत घेतले. मुलांवर हल्ला करता न आल्याने खवळलेल्या हजारो मधमाशा कंचन बाईंवर तुटून पडल्या. सर्व २० मुले सुरक्षित होईपर्यंत त्या झुंजत राहिल्या, पण शेवटी शेकडो डंखांमुळे त्या जमिनीवर कोसळल्या.
गावात शोककळा, पालकांना अश्रू अनावर
गावकऱ्यांनी त्यांना तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जेव्हा कंचन बाईंचे पार्थिव गावात आणण्यात आले, तेव्हा संपूर्ण गाव रडत होते. ज्या मुलांचे प्राण त्यांनी वाचवले, त्यांच्या पालकांना तर अश्रू अनावर झाले होते. “आज आमची मुले जिवंत आहेत ती फक्त कंचन बाईंमुळेच,” अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या.
कुटुंबाचा एकमेव आधार हरपला
कंचन बाई केवळ एक कर्मचारी नव्हत्या, तर त्या त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होत्या. त्यांचे पती शिवलाल हे अर्धांगवायूने ग्रस्त आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. ‘जय माता दी स्वयं-सहायता गटा’च्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यातही सक्रिय होत्या.
गावकऱ्यांची मागणी
या घटनेनंतर गावात अजूनही भीतीचे वातावरण आहे. ज्या झाडावर मधमाशांचे पोळे आहे, तिथेच गावाचा हातपंप असल्याने गावकऱ्यांनी पाणी भरणे बंद केले आहे. प्रशासनाने हे पोळे तातडीने काढावे आणि कंचन बाईंच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



