राष्ट्रवादी काँग्रेस कधीच महायुतीचा भाग नव्हती – आमदार रवी राणा

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट भूमिका
अमरावती
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महायुतीच्या राजकारणाबाबत बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कधीच महायुतीचा भाग नव्हती आणि भविष्यातही विचार जुळत नसल्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. सध्या विविध राजकीय पक्षांमध्ये संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असताना, आमदार रवी राणा यांनी महायुतीच्या भूमिकेबाबत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत भाजपा, युवा स्वाभिमानी पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. या तिन्ही पक्षांमधील जागावाटपाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीला अमरावती महानगरपालिकेत पूर्ण बहुमत मिळेल आणि महायुतीचाच महापौर निवडून येईल, असा ठाम दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. आता आगामी काळात या राजकीय समीकरणांचा अमरावती महानगरपालिका निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



