उद्धव ठाकरे–राज ठाकरे युतीनंतर मनसेला जबरदस्त झटका

24 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दोन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला.
युतीच्या घोषणेनंतर एकीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना, दुसरीकडे मनसेमध्येच तीव्र नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत युती जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांना हा मोठा राजकीय झटका मानला जात असून अनेक मनसैनिक संतप्त असल्याची माहिती समोर येत आहे.
मनसे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष
सूत्रांच्या माहितीनुसार, विशेषतः मुंबईत मनसे कार्यकर्त्यांची नाराजी अधिक आहे. “ज्यांच्याशी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्याशी आता हातमिळवणी कशी करायची?” असा प्रश्न अनेक मनसैनिक उपस्थित करत आहेत. युतीच्या निर्णयामुळे मनसेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढल्याचं चित्र आहे.
शिवसेनेत पक्षप्रवेशाची चर्चा
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील अनेक नाराज मनसैनिक शिंदे गटाच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. येत्या दोन दिवसांत मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नाशिकमध्येही मोठा धक्का
मुंबईपुरताच हा असंतोष मर्यादित न राहता नाशिकमध्येही मनसेला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष असून मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू असल्याची माहिती आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या असंतोषाला अधिक बळ मिळालं आहे.
सेना–मनसे युती जाहीर झाल्यानंतर नाशिकमध्ये मनसेला घरघर लागल्याचं स्पष्ट होत असून येत्या काळात आणखी नेते व कार्यकर्ते पक्ष सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजकीय परिणामांकडे लक्ष
ठाकरे बंधूंची युती महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करत असली, तरी या निर्णयाचा मनसेवर होणारा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणार असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे



