लातूरमध्ये नवविवाहितेची आत्महत्या; चारित्र्य संशयातून छळ केल्याचा आरोप, पती व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पतीच्या चारित्र्य संशयातून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लातूरजवळील वरवंटी शिवारात घडली. या प्रकरणी पती आणि सासऱ्याविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहितेचे नाव आरती रामेश्वर उरगुंडे (वय २५, रा. रायवाडी, लातूर) असे आहे. आरतीचा विवाह ७ मे २०२३ रोजी रामेश्वर सिध्देश्वर उरगुंडे याच्याशी रितीरिवाजात पार पडला होता. मात्र लग्नाच्या काही महिन्यांनंतर पती रामेश्वर याने आरतीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. या संशयातून आरतीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
शुक्रवारी आरतीला पतीच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या महिलेशी झालेले चॅटिंग आढळून आले. याबाबत जाब विचारला असता पतीने तिच्यासोबत वाद घालून मारहाण केली तसेच “तुला जे करायचं ते करून घे” असे धमकीवजा शब्द वापरल्याचे तक्रारीत नमूद आहे. वादानंतर आरतीने आपल्या वडिलांना फोन करून झालेल्या मारहाणीची माहिती दिली.
आरतीचे वडील घरी पोहोचले असता तिने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. दरम्यान, पती दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असतानाच आरतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिला तात्काळ खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.



