नागपूर – महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपुरात आज, सोमवार ८ डिसेंबरपासून सुरू झाले असून १४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सलग ७ दिवसांचे हे अधिवेशन विशेष ठरणार आहे, कारण सुट्टीच्या दिवशीसुद्धा कामकाज सुरू राहणार आहे. राज्यातील तापलेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे.
शासनाने शेतकरी नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली असली तरी “३० जूनपर्यंत पूर्ण कर्जमाफी” या घोषणेनंतर आता विरोधक कोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार, याकडे उत्सुकता आहे. हिवाळी अधिवेशनात खालील प्रमुख प्रश्न गाजण्याची शक्यता आहे—
- शेतकऱ्यांची कर्जमाफी
- पिकांचे नुकसान व त्यावरील मदत
- ओबीसी आरक्षण
- मराठा आरक्षण
- सत्ताधाऱ्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप
- तसेच विदर्भाच्या विकासाला काय मिळणार? हा कायमचा चर्चेतील मुद्दा
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता आमदारांचा प्रवेश सुरू झाला. राज्यातील २८८ आमदार आणि मंत्रिमंडळाचे सदस्य नागपूरमध्ये दाखल झाले असून अधिवेशन परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
City Newsच्या प्रतिनिधींनी विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय आणि प्रताप अडसड यांच्याशी खास चर्चा केली. हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे प्राधान्याने मांडले जाणार आणि विदर्भाच्या विकासाबाबत त्यांची भूमिका काय असणार, याबाबत दोन्ही नेत्यांनी महत्त्वाचे मुद्दे समोर मांडले.
राज्याचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन निर्णायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



