अमरावतीत BDO अधिकाऱ्यांचा सामूहिक रजा आंदोलन; सुनिता मरसकोल्हे यांच्या अटकेचा निषेध

अमरावती: वर्धाच्या आर्वी तालुक्यातील गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे यांची अटकेवरून अमरावती जिल्ह्यातील गटविकास अधिकारी दलात संताप पसरला आहे. त्यांच्या अटकेला “नियमबाह्य” आणि “अन्यायकारक” ठरवून आज जिल्ह्यातील चौदा तालुक्यांतील सर्व BDO अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनामुळे ग्रामविकास विभागातील महत्त्वाची कामे, गावपातळीवरील मंजुरी, विकासकार्यांवरील सही, आर्थिक व्यवहार तसेच विविध सरकारी योजनांचे निर्णय अक्षम झाले आहेत, काही ठिकाणी काम पूर्णपणे ठप्प आहे.
अमरावतीतील BDO अधिकाऱ्यांची एक टीम आज विभागीय आयुक्त श्वेता सिंगल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांची भेट घेण्यासाठी पोहोचली. या बैठकीत त्यांनी सुनिता मरसकोल्हे यांची अटक नियमबाह्य असल्याचा ठाम आरोप केला आणि ही अटक प्रशासनावर दडपण आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
अधिकाऱ्यांनी सरकारकडे सुनिता मरसकोल्हे यांना न्याय देण्याची व अटकेबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली आहे. सध्या आंदोलन किती काळ टिकेल आणि सरकार यावर काय भूमिका घेईल, याकडे जिल्हा आणि राज्याचे लक्ष लागलेले आहे.



