नागपूर खंडपीठाच्या एकत्र मतमोजणीच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाराजी; “चुकीचा कायद्याचा वापर” अशी टीका

नागपूर : नागपूर खंडपीठाने 21 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणुकांची एकत्र मतमोजणी करण्याचा निर्णय दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
फडणवीस म्हणाले, “पहिल्यांदाच पाहतोय की जाहीर निवडणुकांचा निकाल पुढे ढकलला जात आहे. ही पद्धत योग्य वाटत नाही. खंडपीठ स्वायत्त आहे आणि त्याचा निर्णय सर्वांना मान्य करावाच लागतो. इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे. पण मेहनत घेणाऱ्या उमेदवारांसाठी अशी परिस्थिती भ्रम निर्माण करणारी ठरते. सिस्टीमच्या अपयशामुळे उमेदवारांची काहीही चूक नसताना अशी पद्धत अवलंबणे योग्य नाही.”
फडणवीसांनी निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “इलेक्शन कमिशनकडे अशा अनेक निवडणुकांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या सिस्टीममध्ये सुधारणा करून पुढील निवडणुकांसाठी अशा चुका टाळायला हव्यात,” असे त्यांनी सांगितले.
“कायद्याचा चुकीचा वापर” — फडणवीसांची टीका
न्यायालयाच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. “जो कायदा आहे त्याचा चुकीचा वापर इथे करण्यात आला. हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. कोणीतरी कोर्टात गेले म्हणून सगळ्या निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलणे योग्य नाही. नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक पुढे ढकलणे हा चुकीचा निर्णय आहे आणि यावर माझी वैयक्तिक नाराजी आहे.”
फडणवीसांनी हेही नमूद केले की, “फक्त 24 ठिकाणच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे 284 ठिकाणांची एकत्रित मतमोजणी पुढे करणे तार्किकदृष्ट्या चुकीचे आहे.”
“लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची जाणीव ठेवावी”
शेवटी त्यांनी सांगितले, “लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची जाणीव ठेवली पाहिजे. आपण निवडणुकांमध्ये कसे वागतो, काय संदेश देतो, काय संकेत देतो याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.”
मुख्यमंत्री फडणवीसांच्या या विधानानंतर राज्यातील निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्न अधिक चर्चेत आले असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



