हास्यकाव्याची ‘मिर्झा एक्सप्रेस’ बंद… डॉ. मिर्झा बेग यांचे निधन

महाराष्ट्राच्या विनोदी काव्यक्षेत्राला आज मोठा धक्का बसला आहे. आपल्या टोकदार विनोद, अप्रतिम सादरीकरण आणि ठसकेबाज शैलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (वय 68) यांचे आज सकाळी 6.30 वाजता अमरावती येथे निधन झाले. काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या या विदर्भातील गाजलेल्या कवीने उपचारादरम्यान अखेरची श्वास घेतला.
यवतमाळ जिल्ह्यातील धनज–माणिकवाडा येथे जन्मलेल्या मिर्झा बेग यांनी ‘मिर्झा एक्सप्रेस’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात आपली अनोखी ओळख निर्माण केली. अमरावतीतील वलगाव रोड, नवसारी परिसरातील ‘मिर्झा एक्सप्रेस’ या घरातूनच त्यांच्या बहुतेक सादरीकरणांची तयारी व्हायची—आणि तिथूनच हास्यकाव्याचा ‘रेल्वे’ डब्बा पुढे सरकत राहिला.
त्यांच्या मागे पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, व दोन मुली महाजबी आणि हुमा असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी 2 वाजता ईदगा कब्रस्तानात करण्यात येणार आहेत.
डॉ. बेग यांनी विनोदी काव्याला स्वतःची खास चव दिली. ‘जांगडगुत्ता’ सारख्या शब्दांना लोकभाषेत रूजवणारे, लोकांना हास्याच्या लहरींतून सामाजिक वास्तव दाखवणारे ते कवी होते. 20 काव्यसंग्रह आणि तब्बल 6 हजारांहून अधिक काव्यमैफिली—हा त्यांच्या कलाविश्वाचा भव्य प्रवास.
आज तो प्रवास थांबला… पण ‘मिर्झा एक्सप्रेस’ची आठवण मराठवाडा-विदर्भाच्या हृदयात कायम धावतीच राहील.



