अमरावतीत मानव–कुत्रा संघर्षावर उच्चस्तरीय बैठक; ABC कार्यक्रमाला गती, नियंत्रण कक्ष 24×7 सुरू करण्याचा निर्णय

अमरावती शहरात वाढत्या मानव–कुत्रा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिका क्रमांक ०५/२०२५ नुसार आज अमरावती महानगरपालिकेत एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न आणि ABC (Animal Birth Control) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीस आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, पशुवैद्यकीय शाखा, कायदेविषयक विभाग तसेच पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयुक्तांनी शहरातील धोकादायक आणि आक्रमक कुत्र्यांची स्वतंत्र नोंदणी करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्व वॉर्डांचे वैज्ञानिक सर्वेक्षण, स्टरलायझेशन आणि लसीकरण मोहिमेला गती देण्यावर भर देण्यात आला.
महत्वाचे निर्णय :
- 24×7 नियंत्रण कक्ष सुरू होणार, नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवून जलद कारवाई
- सर्व तक्रारींची डिजिटल नोंदणी अनिवार्य
- वाढत्या उघड्या कचर्यावर नियंत्रणासाठी स्वच्छता विभागाला कडक निर्देश
- शाळांमध्ये Responsible Pet Ownership आणि रेबिज प्रतिबंध यावर विशेष जनजागृती मोहीम
- प्राणी पुनर्वसन केंद्रांची क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर
बैठकीत असे स्पष्ट करण्यात आले की उघडा कचरा हा भटक्या कुत्र्यांच्या वाढीचा प्रमुख कारण असून, कचरा व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की,
“नागरिकांची सुरक्षितता आणि प्राण्यांचे संरक्षण — या दोन्ही गोष्टींचे संतुलन राखत न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे.”
अमरावतीत भटक्या कुत्र्यांमुळे वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



