तरुणांचा थेट सवाल! “आमच्यासाठी काय केलं?” – प्रचार सभेत काँग्रेस जिल्हाध्यक्षांना कोंडीत पकडले

भोकरदन नगरपरिषद निवडणुकीतील प्रचार मोहीम जोर धरत असताना रफिक कॉलनी भागात आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांना नागरिकांच्या नाराजीचा प्रत्यक्ष सामना करावा लागला. प्रचारासाठी पोहोचलेल्या देशमुखांना स्थानिक तरुणांनी पाणी, रस्ते, नाले आणि स्वच्छतेच्या कामांबाबत थेट प्रश्न विचारत कोंडीत पकडले.
“आमच्यासाठी नेमकं काय काम केलं?”, “या कॉलनीची अवस्था तरी सुधारली का?”, अशा रोखठोक प्रश्नांमुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले. तरुणांनी परिसरातील नाले–रस्त्यांची दयनीय अवस्था प्रत्यक्ष दाखवत नागरी सुविधांच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त केली.
काही वेळ नेत्यांना स्पष्ट उत्तर देणे अवघड झाले असले, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. तरुणांचा रोष हा फक्त विरोध नसून उत्तरे आणि जबाबदारीची मागणी असल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे स्थानिक विकासकामांचा मुद्दा आता प्रचारातील प्रमुख विषय ठरत असून पुढील सभांमध्ये या परिस्थितीवर देशमुख कोणती भूमिका मांडतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.



