अमरावती : प्रारूप मतदार यादीत मोठी हेराफेरी? काँग्रेसचा गंभीर आरोप; २२ प्रभागांच्या तपासणीची मागणी

अमरावती महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीनंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ, चुका आणि हेतुपुरस्सर हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. याद्वारे “मतांची चोरी” करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप-महायुतीकडून होत असल्याचा दावाही काँग्रेसकडून करण्यात आला.
प्रारूप मतदार यादी महानगरपालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होताच शहरात चर्चा, प्रतिक्रिया आणि नाराजीचा सूर उमटू लागला. काँग्रेसने पत्रकार परिषदेत काही गंभीर मुद्दे मांडत यादीतील अनियमिततांवर बोट ठेवले.
काँग्रेसचे मुख्य आरोप :
- अनेक प्रभागांमध्ये अनोळखी आणि बाहेरील व्यक्तींची नावे अचानक समाविष्ट.
- मूळ रहिवाशांची योग्य व जुनी मते बेकायदेशीरपणे हलवून इतर प्रभागांत दाखल.
- हजारो पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब किंवा वगळली गेल्याचा दावा.
- संपूर्ण प्रक्रियेच्या मागे सत्ताधारी भाजप-महायुतीकडून हेतुपुरस्सर मतांची फेरफार आणि मतचोरीचा आरोप.
काँग्रेसने मागणी केली की—
- सर्व २२ प्रभागांच्या मतदार याद्यांचे स्वतंत्र, तांत्रिक आणि पारदर्शक पुनरावलोकन तात्काळ करावे.
- चुकीने हलविलेली मते पुन्हा मूळ प्रभागात समाविष्ट करावीत.
- अनोळखी नावांची तात्काळ अमान्य नोंद करून वगळणे आवश्यक.
- पात्र असूनही वगळलेल्या सर्व नागरिकांची नावे योग्य प्रभागात पुन्हा जोडावीत.
पत्रकार परिषदेत काँग्रेसने इशारा दिला की,
या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.
सध्याच्या स्थितीत प्रारूप मतदार यादीतील वाढत्या तक्रारी आणि आरोपांमुळे अमरावतीचे राजकारण ढवळून निघाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असून आगामी दिवसांत ही लढत आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



