Latest News
मुंबई–नाशिक महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर

मुंबई–नाशिक महामार्गावर आटगाव परिसरात पहाटे भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रात्री तीन जण जेवणासाठी हॉटेलवर गेले होते. परत येत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर आदळून रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात कोसळली.
या अपघातात ताणसा येथील मयुरेश विनोद चौधरी (२९) आणि उंबरखांड येथील जयेश किसन शेंडे (२५) यांचा जागीच मृत्यू झाला. पेंढरघोळ येथील हर्षल पांडुरंग जाधव (२९) गंभीर जखमी असून त्याला तात्काळ शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मयुरेश चौधरी यांचे २ डिसेंबर रोजी लग्न होणार होते, त्यामुळे या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



