शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरित पूर्ण करावी – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान अमरावती जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या 5 लाख 69 हजार शेतकऱ्यांचा माहिती डेटा ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. या नुकसानभरपाईसाठी 542 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत वितरीत करण्यात आला आहे.
निधीचा लाभ वेळेत आणि सुरळीतपणे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या आगामी योजनांसाठी पात्रता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
सध्या ई-केवायसी सुविधा पूर्ववत सुरू असून, ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया अद्याप केली नाही त्यांनी आधार कार्डसह आपल्या जवळील ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणीही अनिवार्य
ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी गाव नमुना 7/12 उतारा आणि आधार कार्डसह आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ मिळवावा.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले की, या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील सरकारी योजनांचा लाभ मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले.



