यशोमती ठाकूर भाजपमध्ये दिसतील” – आ. रवी राणा यांचा दावा; अमरावतीच्या राजकारणात खळबळ

अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांनी धडाकेबाज दावा केला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर या पुढील सहा महिन्यांत भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी “काळ्या दगडावरची पांढरी रेघ” असल्याचा दावा त्यांनी केला.
रवी राणा यावर थांबले नाहीत. त्यांनी आरोप केला की यशोमती ठाकूर यांनी काही काळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तिवसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तिकीट मागितले होते. फडणवीस यांच्याकडे “तिकीट मिळाल्यास मी भाजपमध्ये येण्यासाठी तयार आहे,” असे ठाकूर यांनी सांगितल्याचा दावा रवी राणा यांनी केला.
मात्र त्या वेळी राजेश वानखडे यांनाच तिवसातून उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याने ठाकूर नाराज झाल्या आणि तेव्हापासूनच त्यांच्याबाबत पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
याशिवाय, अमरावती जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसने एकाही ठिकाणी यशोमती ठाकूर यांच्या शिफारशीवर उमेदवारी दिली नसल्याचाही आरोप रवी राणांनी केला. “सर्व ठिकाणी मुस्लिम उमेदवार पुढे केले जात आहेत,” असा दावा त्यांनी केला.
रवी राणा यांच्या या विधानानंतर अमरावतीच्या राजकारणात तापमान चांगलंच वाढलं आहे. यशोमती ठाकूर खरंच भाजपमध्ये जाणार का? त्या काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



