पाथरगाव उपसा सिंचन योजनेच्या पाणी वापर संस्थांना एकदिवसीय प्रशिक्षण2025 च्या रब्बी हंगामापासून मिळणार शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी

मोर्शी तालुक्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत पाथरगाव उपसा सिंचन योजनेचे बांधकाम पूर्ण झाले असून रब्बी हंगाम 2025 पासून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून (पा.वा.सं.) करण्यात येणार असल्याने या संस्थांना सक्षम करण्याच्या उद्देशाने एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाला ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता मनीष राजभोज, सेवानिवृत्त प्राध्यापक बाळासाहेब शेटे, तसेच माजी जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता किशोर वरंभे उपस्थित होते. कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी प्रास्ताविक केले.
पाण्याचा इष्टतम वापर करण्याचे आवाहन
अधीक्षक अभियंता राजभोज यांनी ‘महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन 2005’ या कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या पाणी वापर संस्थांना
- पाण्याचा कार्यक्षम व मोजून वापर,
- योग्य पीक पद्धती निवडणे,
- घनमापन पद्धतीचा अवलंब,
- पाणीपट्टी प्रभावी वसुली
या उपक्रमांद्वारे गावाच्या सर्वांगीण विकासात योगदान देण्याचे निर्देश दिले.
सिंचन कायदे आणि गट शेतीवर मार्गदर्शन
प्राध्यापक शेटे आणि माजी अभियंता वरंभे यांनी
- सिंचन कायदे
- पाणी वापर संस्थांची रचना व कार्यप्रणाली
- गट शेतीची संकल्पना
यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
सहा संस्थांचा सहभाग
या प्रशिक्षणात खालील सहा पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष व सदस्य सहभागी झालेः
- संत सेवालाल महाराज (जळका)
- संत पांडुरंग महा. (जळका)
- एकनाथ महा. (आमला)
- विश्वेश्वर पा.क.रते. (आमला)
- परिवर्तन (टेंभुर्णी)
- समृद्धी (टेंभुर्णी)
सहभागी सदस्यांना हस्तांतरण प्रमाणपत्र आणि उपस्थिती प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले



