ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीला कुलूपबंद करण्याचा इशारा

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावातील वार्ड क्रमांक चारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
गावातील नाल्याचे घाण पाणी साचून राहिल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. डासांची उत्पत्ती वाढली असून, डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नाल्याचे काम गेली तीन वर्षे रखडलेले आहे. जिथे नाल्याची आवश्यकता नव्हती तिथे काम करण्यात आले, मात्र वार्ड क्रमांक चार सारख्या सर्वाधिक समस्याग्रस्त भागाकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी वारंवार सरपंच आणि ग्रामपंचायतीला तक्रारी केल्या, पण अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत. नागरिकांनी आता स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर नाल्याचे काम सुरू झाले नाही, तर ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले जाईल. गावातील वृद्ध आणि लहान मुले या दूषित पाण्यामुळे आजारी पडत आहेत. आरोग्य विभागाने तातडीने या भागात स्वच्छतेचे आणि आरोग्य तपासणीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्रामस्थ आता प्रशासनाकडून ठोस उत्तराची अपेक्षा करत आहेत.



