मध्यरात्री पेटला शेतकऱ्याचा आखाडा – तीन जनावरे खाक!

अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील डॉ. संजय कल्याणकर यांच्या गट क्रमांक सातमधील आखाड्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत तीन जनावरे जिवंतपणी जळून खाक झाली. आखाड्यावर ठेवलेले बी-बियाणे, खते, सोयाबीन, गहू, जवारी, ठिबक सिंचनाच्या पाईपांसह इतर शेती अवजार आगीत पूर्णपणे नष्ट झाले आहेत. शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी सोयाबीनचा माल विकायचा न ठरवता भाव वाढेल या आशेने तो आखाड्यावर ठेवला होता. परंतु नियतीनं वेगळंच लिहून ठेवलं होतं. सकाळी गावकऱ्यांनी धुराचे लोट आणि राख झालेला आखाडा पाहून धक्का बसला. घटनास्थळी तलाठी व महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. एकूण चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शेतकऱ्याला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. गावकऱ्यांमध्ये या घटनेनंतर संतापाचे वातावरण असून पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे.



