मुळशीतील दारवलीमध्ये युवकाची हत्या गायींच्या गोठ्यात मृतदेह आढळला

पुणे : मुळशी तालुक्यातील दारवली परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गायींच्या गोठ्यात एका युवकाचा निर्घृण खून झाल्याचे लक्षात आले आहे. मृत व्यक्तीची ओळख सागर भाऊराव माश्रम (वय ३२, रा. गंगापुरी, ता.वाई, जि. सातारा) अशी करण्यात आली आहे.
घटनेनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास सागरच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याचा खून केला गेला. त्यानंतर मृतदेह गोठ्याच्या गेटजवळ ओढून टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर माश्रम हा सदर गोठ्यात काम करत होता आणि मृतदेह रक्ताचा थारोळ्यात पडलेला आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
स्थानिकांच्या मते, ही घटना परमार बंगला परिसरात घडली असून, त्या परिसरावर धनंजय देसाई यांनी बेकायदेशीररीत्या ताबा घेतल्याचे आरोप आहेत. घटनेची माहिती मिळताच मुळशी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरु केला आहे. सध्या पोलिस अधिक तपास करत असून, खून का आणि कोणत्या कारणामुळे झाला, याचा खुलासा झालेला नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.



