शेतकऱ्यांची दिवाळी काळी – सरकारवर प्रदेश काँग्रेसचा हल्लाबोल

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, वीजदरवाढ, खत आणि बियाण्यांच्या दरात वाढ, तर भरपाईच्या वचनावर सरकारने मौन धारण केल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस दिलीप एडतकर यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले — “या सरकारच्या नाकरतेपणामुळे शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे.”
पुसद विधानसभा निरीक्षक म्हणून नुकत्याच झालेल्या त्यांच्या नियुक्तीनंतर एडतकर यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामीण जनतेच्या भावना मांडल्या. ते म्हणाले की, ग्रामीण भागात असंतोष उसळला असून हा आक्रोश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतपेट्यांमधून स्पष्ट दिसून येईल. ते पुढे म्हणाले — शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या पिकांचे योग्य भाव मिळावेत आणि नुकसानभरपाई तातडीने मिळावी, हीच आजच्या काळाची गरज आहे. पण सरकार केवळ घोषणा करत आहे, कृती मात्र नाही. एडतकर यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फुटली असून, ग्रामीण समाजात या प्रतिक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.



