IND vs AUS 1st ODI: पावसाने पुन्हा व्यत्यय; भारताची ४६ धावांत ४ गडी बाद

पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज (१९ ऑक्टोबर) होत आहे. सामन्याची सुरुवात भारताच्या फलंदाजीने झाली असून, टॉस हरल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. मात्र, पावसामुळे हा सामना अनेक वेळा थांबवावा लागला असून, आता तो ३५ षटकांचा करण्यात आला आहे.
भारताची फलंदाजी डळमळीत झाली असून, केवळ १४.२ षटकांत ४ गडी गमावून केवळ ४६ धावा झाल्या आहेत. सध्या अक्षर पटेल आणि केएल राहुल क्रीजवर आहेत. श्रेयस अय्यर केवळ ११ धावांवर झेलबाद झाला. त्याच्या आधी रोहित शर्मा (८), विराट कोहली (०) आणि शुभमन गिल (१०) हे तिघेही स्वस्तात बाद झाले. रोहित त्याचा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता, मात्र तो केवळ १६ मिनिटे टिकला.
पावसामुळे सामना तीन वेळा थांबवण्यात आला असून, दुसऱ्या व्यत्ययानंतर डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्याचा कालावधी ३५ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. प्रत्येक गोलंदाजाला सात षटकांची मर्यादा देण्यात आली आहे. भारताने १४ षटकांत ४५ धावा करताना चार गडी गमावले आहेत.
सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल तिन्ही प्रमुख फलंदाज झटपट माघारी परतले. कोहली खातेही उघडू शकला नाही. मिशेल स्टार्कच्या चेंडूवर कॉनॉलीने त्याचा झेल घेतला. दरम्यान, मैदानावर चाहत्यांनी विराट कोहलीचे जोरदार स्वागत केले होते.
सामन्यासाठी दोन्ही संघांची खेळाडू निवड जाहीर झाली आहे. भारताकडून खेळणाऱ्या अकरा खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनॉली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन आणि जोश हेझलवुड हे मैदानात उतरले आहेत.
सध्या पावसामुळे पुन्हा एकदा सामना थांबवण्यात आला आहे आणि वातावरणात अनिश्चितता कायम आहे. मैदानावरील स्थिती पाहता पुढील निर्णय लवकरच घेतला जाईल.



