मेहकर-लोणार दोन तालुके अतिवृष्टी यादीतून वगळले

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार हे दोन तालुके अतिवृष्टीच्या यादीतून वगळल्याबद्दल सरकारकडे थेट सवाल उपस्थित केला आहे. तुपकर म्हणाले — ढगफुटी स्वरूपाच्या पावसामुळे दोन्ही तालुक्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात 358 तालुके अतिवृष्टीमुळे प्रभावित असताना सरकारने फक्त 253 तालुकेच यादीत घेतले असून 105 तालुके वगळण्यात आले आहेत.
त्यात मेहकर आणि लोणार तालुक्यांचाही समावेश नाही, ही बाब अन्यायकारक असल्याचं तुपकरांनी म्हटलं आहे. रविकांत तुपकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर दोन्ही तालुके अतिवृष्टीच्या यादीत समाविष्ट केले नाहीत, तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या संदर्भात त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनही दिले आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात देखील या निर्णयावर संतापले आहेत. खरात म्हणाले — “मेहकर आणि लोणार तालुके अतिवृष्टीग्रस्त यादीत तातडीने समाविष्ट करण्यात यावेत. अन्यथा मंत्र्यांची पण दिवाळी शेतकऱ्यांसोबतच साजरी होईल.” त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आता सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.



