रतनगंज प्रभागात स्वच्छता ठेकेदारांकडून नागरिकांची फसवणूक

अमरावती : अमरावती शहरातील रतनगंज प्रभाग हा शहराच्या मध्यवर्ती भागातील घनदाट वस्ती असलेला परिसर आहे. या भागात दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. तथापि, रतनगंज ते साहूबाग रोडवरील स्वच्छता पोटठेकेदारांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, नाल्यांची साफसफाई गेल्या कित्येक महिन्यांपासून झालेली नाही. त्यातच सार्वजनिक शौचालयाची दररोज स्वच्छता करण्याऐवजी पंधरा दिवसांनी एकदाच साफसफाई केली जाते. परिणामी परिसरात दुर्गंधी, डास आणि अस्वच्छता वाढली आहे. नागरिकांच्या मते, संबंधित पोटठेकेदारांनी केवळ बिलं उचलून कामावर कानाडोळा केला आहे. महानगरपालिकेचे निरीक्षण अधिकारीही या गंभीर स्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याने, नागरिक संतप्त झाले आहेत. काही नागरिकांनी तर स्वतःच्या पैशातून नाली साफ करण्याची वेळ आली आहे, हे शहर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करतं. नागरिकांनी महानगरपालिकेकडे ठेकेदारांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. जर यावर त्वरीत उपाययोजना झाली नाही, तर मोठा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.



