केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय: महागाई भत्त्यात वाढ; नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता (DA) ३ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली असून, त्यामुळे हा भत्ता आता ५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, ही वाढ आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपूर्वीच करण्यात आली असून, सातव्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणारा हा शेवटचा महागाई भत्ता ठरणार आहे.
महागाई भत्त्यात ही वाढ जुलै २०२५ पासून लागू असून, ती नोव्हेंबर २०२५ पासून पगारात प्रत्यक्ष दिसून येणार आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या खात्यात मागील तीन महिन्यांचा एरियरही जमा केला जाणार आहे. सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलै या दोन टप्प्यांमध्ये महागाई भत्त्यात सुधारणा करते. यंदा जुलैची सुधारणा काहीशी उशिराने जाहीर झाली आहे.
या निर्णयामुळे दिवाळीपूर्वी लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे गिफ्ट मिळणार आहे. महागाईच्या वाढत्या दरामुळे कर्मचाऱ्यांवरील आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. काही कारणास्तव त्याची अंमलबजावणी विलंबाने झाली तरी संबंधित कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना एरियर दिला जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी कर्मचारी आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.



