“स्वच्छ भारतासाठी स्वतःपासून सुरुवात करा” – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

सांगली : “माझे घर, माझी कॉलनी, माझा गाव, माझी शाळा, माझे महाविद्यालय आणि माझे कार्यालय या भावनेने ते स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परिसराबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असून, स्वच्छता ही एकप्रकारे देशसेवा असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सेवा पंधरवड्यामध्ये दिनांक 17 सप्टेंबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या कालावधीत स्वच्छतेचे कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, गरीब वस्त्यांमध्ये जाऊन आर्थिक मदत करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात येत असून, या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
आज आपण पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस म्हणून साजरा करत असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, एनएसएसच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम गावागावांमध्ये राबविले जातात. यामधून समाजातील सद्यस्थिती लक्षात कळते व भविष्यात समाज हितासाठी निर्णय केले जातात. या माध्यमातून राष्ट्रीय सेवा युनिट चांगला नागरिक तयार होण्यासाठी मदत करते.
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली व परिसरात स्वच्छता केली. यावेळी त्यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अनिल सुगते यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



