Latest NewsMaharashtraNagpur

शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन

नागपूर : आपल्या दैनंदिन मुलभूत गरजांब मनःशांती आवश्यक गोष्ट आहे. परिस्थिती कायम सारखी नसते. वाईट दिवसही सरून जातात. त्यामुळे शेतक-यांनी धीर ठेवून आत्महत्येसारखा मार्ग अवलंबू नये. नैसर्गिक शेतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा, असे आवाहन आध्यात्मिक गुरू व आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांनी आज येथे केले.

रामटेक येथील नेहरू मैदान येथे कृषी प्रदर्शनी व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार आशीष देशमुख, कृषी व पदुम विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह स्थानिक भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, आज जग मानसिक तणावाखाली आहे. ४ पैकी एक व्यक्ती मानसिक तणावाखाली आहे. अमेरिकत ४७ टक्के नागरिक एकटेपणाच्या आजाराखाली आहेत. यासाठी गाण, ध्यान आणि ज्ञान जीवनात अवलंबण्याची गरज आहे. यातून जीवनात उत्साह येईल. गोसंरक्षण केल्यास आणि कृषी क्षेत्र सांभाळल्यास देश पुढे जाईल, असे आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यावेळी म्हणाले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अत्यंत कौतुकास्पद असे कृषी प्रदर्शनी आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षात रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, पाणंद रस्त्याकडे फारशे लक्ष नव्हते. याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री बळीराजा रस्ते विकास योजना राज्यात आणण्याचा संकल्प असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतीमध्ये बदल केले पाहिजे. नावीन्यपूर्ण गोष्टी शेतक-यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. रासायनिक खते आणि कीटकनाशके यावर अवलंबून तात्पुरते उत्पादन घेण्यात येते. मात्र, दीर्घकाळासाठी वापर जास्त केल्यास जमिनीची सुपीकता कमी होते. त्यामुळे नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. त्यामुळे राज्यात सेंद्रीय शेती मिशन, जमिनीची आरोग्य पत्रिका, पाणी बचत आदी उपक्रम अवलंबण्यात येत आहेत. एआय कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब कृषी क्षेत्रात राबविण्याचा निर्णय घेतला असून हा शेतक-यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे कृषीमंत्री श्री. भरणे यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. शेतक-यांच्या हितासाठी कृषीशी संबंधित अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यात पीक विमासह नुकसान भरपाई, स्मार्ट प्रकल्प, नानाजी देशमुख कृषी संजीवन योजनेत नागपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विविध प्रकारचे लाभ शेतक-यांना देण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित शेतक-यांनाही लवकरच लाभ मिळणार आहे. राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या संपाव्यात यासाठी विविध प्रकल्प, योजना कृषी क्षेत्रात सुरू केले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होत असून या आत्महत्या शुन्यावर आणायच्या आहेत. विविध विभागांची जबाबदारी सांभाळत असताना राज्यातीलजनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. शेतक-यांच्या आशा अपेक्षा पूर्ण कगरण्यासाठी विविध योजना राबवित आहेत. निसर्गाच्या कोपातून शेतक-यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. शेतक-याप्रमाणेच शेतमजुरांसाठीही लवकरच योजना आणणार असल्याचे ॲड. जयस्वाल यावेळी म्हणाले.

विविध सामंजस्य करार

आर्ट ऑफ लिव्हिंग आणि जिल्हाधिकारी नागपूर यांच्यादरम्यान फिरते माती परीक्षण प्रयोगशाळेचा सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग कडून फिरते माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध होणार आहेत. सेंद्रीय शेती प्रमाणीकरण व शेतमाल विकत घेण्याचा करार करण्यात आला. रामटेक अग्रोव्हिजन फार्म प्रोड्युसर कंपनी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यात सामंजस्य करण्यात आला. तर १५०० किलोमीटर नाला व तलाव खोलीकरण व रुंदीकरणाचा करार जिल्हाधिकारी नागपूर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यादरम्यान करण्यात आला. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहिती देणा-या पुस्तिकेचे, सेंद्रीय शेती आणि शाश्वत शेती या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. काही प्रगत शेतक-यांचेही यावेळी सत्कार करण्यात आले. रामटेक येथे कौशल्य विकास केंद्र उभे करण्यात येणार असून याचीही माहिती कार्यक्रमादरम्यान देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ संदेश

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ध्वनिमुद्रित संदेश दाखविण्यात आला. या संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी प्रदर्शनी व मेळाव्यास शुभेच्छा देत या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button