मेळघाटच्या विकासासाठी जनसंकल्प मेळावा

मेळघाट- आपल्या विदर्भाच्या अभिमानाबद्दल. मेळघाट म्हणजे फक्त डोंगर आणि नद्या नाहीत. मेळघाट म्हणजे उत्तुंग पर्वत रांगा, खळाळणारे धबधबे, आणि घनदाट जंगलं. इथे आहे दुर्मिळ वनसंपदा, खनिज संपत्ती आणि अमूल्य वनौषधींचा खजिना. व्याघ्र प्रकल्प, विविध पक्ष्यांचे घर आणि आदिवासी संस्कृतीचा अनोखा वारसा. कोरकू, गोंड, निहाल, आणि इतर आदिवासी समाजाची लोककला, लोकगीतं, आणि परंपरा इथे जिवंत आहेत.
पण हे वैभव आज धोक्यात आहे. उपेक्षित आदिवासी बांधव, विस्थापितांच्या वेदना, वनसंपदेची बेफाम लूट, कुपोषण, आणि बालमृत्यूचे भयाण वास्तव आपण अनुभवत आहोत. इथले रस्ते, शिक्षण, आणि आरोग्य सेवांची अवस्था दयनीय आहे. बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेने तरुणाईला ग्रासले आहे. सरकारी आणि प्रशासकीय अनास्थेमुळे मेळघाटची ओळख हरवत चालली आहे.
पण… एक नवा दिवस उजाडत आहे. रविवार, १४ सप्टेंबर रोजी, विदर्भ राज्य आंदोलन समितीने चिखलदरा येथे ‘मेळघाट विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये या सर्व समस्यांवर उपाय शोधले जाणार आहेत. मेळघाट विद्यापीठाची स्थापना, देवधान्य कृषी प्रकल्प, पर्यटन विकास, आधुनिक शिक्षण आणि आरोग्य सुविधा, तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे.



