मेहकरमध्ये घाण पाण्यामुळे नागरिक संतप्त रस्ता रोको आंदोलन

मेहकर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घाण पाण्याची समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. शहरातील ग्रामदेवता शीतला माता मंदिर परिसर आणि श्री शारंगधर बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या मधोमध हे घाण पाणी साचले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी आणि आता आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही हीच परिस्थिती कायम आहे.
या गंभीर समस्येबद्दल नागरिकांनी वारंवार मेहकर नगरपरिषदेकडे निवेदने दिली, तक्रारी केल्या. मात्र, नगरपरिषदेने कायमस्वरूपी उपाययोजना न करता फक्त थातूरमातूर कामे केली, असा आरोप नागरिकांनी केला आहे. नगरपालिकेच्या या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या शिवचंद्र गणेश मित्र मंडळाच्या नेतृत्वाखालील नागरिक आणि शिवसैनिकांनी आज ‘नगरपरिषद मुर्दाबाद’च्या घोषणा देत रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. नागरिकांच्या मागणीनुसार लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे, अन्यथा शहरात अशाच प्रकारचे आंदोलन पुन्हा होण्याची शक्यता आहे.



