मुंबईत जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आणि मंत्री छगन भुजबळ ‘अॅक्शन मोड’वर, उद्या ओबीसी नेत्यांची पत्रकार परिषद

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, “आरक्षण मिळेपर्यंत उठणार नाही,” अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यामुळे एकीकडे सरकारवर दबाव वाढताना दिसत आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा ओबीसी समाजातून विरोध केला जात आहे. आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ ‘अॅक्शन मोड’वर आल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठा आरक्षणावरून वाढत्या हालचालींचा ओघ पाहता, मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची उद्या (1 सप्टेंबर) मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. ओबीसी आरक्षणाचे संभाव्य परिणाम आणि मराठा आरक्षणावर ओबीसी समाजाची भूमिका याबाबत या बैठकीत सखोल चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
बैठकीनंतर ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत ओबीसी समाजाची अधिकृत भूमिका जाहीर होणार असून, विशेषतः हैदराबाद गॅझेट, सातारा आणि औंध गॅझेट यासंदर्भात हाय कोर्ट व सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा संदर्भ देत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे. या पत्रकार परिषदेतून मंत्री छगन भुजबळ नेमके कोणते मुद्दे उपस्थित करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे तीन दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यातच आज रविवारी (दि. 31) मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना टोकाचा निर्णय घेतला आहे. मी काल आणि आज पाणी पिलो आहे. उद्यापासून पाणी पिणे मी बंद करणार आहे. सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाही. त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. उद्यापासून आमरण उपोषण कडक सुरू करणार आहे. उद्यापासून पाणीसुद्धा बंद करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.



