टेन्शन वाढवणारी बातमी! महाराष्ट्र सरकारकडून ‘या’ 2 सुट्ट्या रद्द; सर्वाधिक गर्दीच्या दिवशी मुलांना शाळेत पाठवावं लागणार?
राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच अचानक दोन नवीन सुट्ट्या जाहीर करत शालेय विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का दिला असला तरी आता त्या मोबदल्यात दोन सुट्ट्या रद्दही करण्यात आल्यात. याच पालकांना टेन्शन आलं आहे.
राज्यातील शाळांना नुकतीच नारळीपौर्णिमेची सुट्टी देण्यात आली. तसेच पुढील महिन्यामध्ये गौरी-गणपतीसाठीही सुट्टी देण्यात येणार असल्याचं राज्य शासनाने 7 ऑगस्टला जाहीर केलं. मात्र या सुट्ट्या देताना राज्य सरकारने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन असताना आणि दहीहंडीच्या दिवशीच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. त्यामुळेच आता या दोन्ही दिवशी शाळा भरवल्या जाणं अपेक्षित असलं तरी केलेला हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. पालकांनाही ज्या दोन दिवशी बाहेर प्रचंड गर्दी असते अशा दिवशी सुट्ट्या रद्द करणे चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
शहरातील सर्वाधिक गर्दीचे दिवस
मुंबईमध्ये सर्वाधिक गर्दी असलेले दोन सण म्हणजे अनंत चतुर्दशी आणि दहिहंडीचा दिवस. या दोन्ही दिवशी वाहतूक व्यवस्थेचं विशेष व्यवस्थापन केल्यानंतरही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं. गोविंदा पथकेही दहिहंड्या फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरात जागोजागी फिरत असतात. अनेक चौकांमध्ये मोठ्य मोठ्या हंड्यांचं आयोजन करण्यात आलेलं असतं. याच कारणामुळे अनेक मार्ग पूर्णपणे किंवा तत्वत: बंद असतात. विसर्जन मिरवणुकांमुळेही शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो. आधीच एवढा गोंधळ असताना अशा दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावं लागणं हे अपघातांना आमंत्रण देण्यासारखं असल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. या दिवशी सुट्टी दिली नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासन घेणार आहे का? असा सवाल पालक आणि शिक्षक विचारत आहेत.
विद्यार्थी गर्दीत हरवले तर…
या दोन्ही दिवशी प्रचंड गर्दी रस्त्यावर असते. त्यामुळे शाळेत येताना अथवा जाताना एखादा विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी हरवली तर त्याची जबबादारी शासन घेणार आहे का? असा सवालही पालकांकडून उपस्थित केला जातोय.
निर्माण झाला संभ्रम
लहान मुलांमध्ये सणासुदीला विशेष उत्साह असतो अशा दिवशी रस्त्यावर गर्दी असतानाही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं पटण्यासारखं नाही. सुट्ट्यांमध्ये केलेले बदल व्यवहार्य नाहीत, अशी टीका पालकांनी केली आहे. मागील अनेक वर्षांपासून चालत आलेली ही सुट्ट्यांची परंपरा अचानक बदलून नवा संभ्रम पालकांमध्ये तसेच शाळा व्यवस्थापनामध्ये निर्माण झाला असून हे असं करणं योग्य नसल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
1. राज्य सरकारने शाळांच्या सुट्ट्यांबाबत कोणता निर्णय घेतला आहे?
राज्य सरकारने नारळीपौर्णिमेसाठी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, तसेच पुढील महिन्यात गौरी-गणपतीसाठीही सुट्टी देण्याची घोषणा 7 ऑगस्ट 2025 रोजी केली. मात्र, अनंत चतुर्दशी (गणपती विसर्जन) आणि दहीहंडीच्या दिवशीच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
2. अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी सुट्ट्या का रद्द केल्या?
राज्य सरकारने याबाबत स्पष्ट कारण दिलेले नाही. मात्र, या निर्णयामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये नाराजी आहे, कारण या दोन्ही दिवशी मुंबईत प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.
3. या निर्णयाविरोधात शिक्षक आणि पालकांचे मुख्य आक्षेप काय आहेत?
शिक्षकांचे म्हणणे आहे की, अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी रस्त्यांवर प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी असते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे धोकादायक आहे. पालकांचे म्हणणे आहे की, या सणांच्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे सुरक्षित नाही आणि सुट्ट्या रद्द करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही.
4. अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी कोणत्या समस्या उद्भवतात?
या दोन्ही दिवशी मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुका आणि गोविंदा पथकांमुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी होते. अनेक मार्ग पूर्णपणे किंवा तात्पुरते बंद असतात. वाहतूक व्यवस्थापन करूनही वाहतूक कोंडी टाळता येत नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे-येणे जोखमीचे ठरते.
5. पालकांनी कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत?
पालकांनी विचारले आहे की, या गर्दीच्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत येताना-जाताना एखादा विद्यार्थी हरवला किंवा अपघात झाला, तर त्याची जबाबदारी शासन घेणार आहे का? तसेच, सणासुदीच्या उत्साहात लहान मुलांना शाळेत पाठवणे योग्य नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.



