जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच निधन

Satyapal Malik Passes Away : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं आज निधन झाले. दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले. दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. जम्मू-काश्मीरनंतर दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
सत्यपाल मलिक यांना मे २०२५ मध्ये दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सत्यपाल मलिक यांना मूत्रमार्गाचा संसर्ग झाला होता. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या ३ महिन्यांपासून त्यांच्यावर याच रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सत्यपाल मलिक हे मूळचे उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील हिसवाडा गावचे होते. त्यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी झाला होता. त्यांचा जन्म एका जाट कुटुंबात झाला होता. त्यांनी मेरठ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर त्यांनी एलएलबीची पदवी मिळवली होती. मेरठ कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी १९६८ पासून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. ते १९७४-७७ पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
१९८० ते १९८९ पर्यंत त्यांनी राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. १९८९ ते १९९१ पर्यंत ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलिगड येथून नवव्या लोकसभेचे खासदार होते. त्यानंतर सत्यपाल मलिक यांनी ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे राज्यपाल म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. ते जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपाल होते.



