मुंबईकरांनो काळजी घ्या! डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया रुग्णांमध्ये मोठी वाढ; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर..?

Monsoon Diseases : मुंबईत पावसाळा सुरू झाल्यानंतर मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Summary
जुलै महिन्यात मुंबईत डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण ५००% पेक्षा जास्त वाढले आहेत.
मलेरियाचे रुग्णही ४६% वाढले असून, ओपीडीमध्ये मोठी गर्दी झाली आहे.
नागरिकांची भीती आणि वाढलेली तपासणी ही रुग्णसंख्या वाढीमागे एक कारण आहे.
बीएमसीने जनजागृती मोहिमांवर भर दिला असून, डॉक्टरांनी स्वच्छता आणि त्वरित उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई शहरात पावसाळ्याच्या आगमनानंतर कीटकजन्य आणि पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जुलै महिन्यात शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस आणि हिपॅटायटीस यांसारख्या आजारांनी नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण केला आहे.
आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये मलेरियाचे रुग्ण १,२९४ नोंदवले गेले, जे जून महिन्यातील ८८४ रुग्णांच्या तुलनेत सुमारे ४६ टक्क्यांनी अधिक आहेत. डेंग्यू आणि चिकनगुनिया यांसारख्या आजारांमध्ये तब्बल ५०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. जूनमध्ये डेंग्यूचे १०५ रुग्ण होते, जे जुलैमध्ये ७०८ पर्यंत गेले, तर चिकनगुनियाचे रुग्ण २१ वरून १२९ वर पोहोचले. लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण ३६ वरून १४३ आणि हिपॅटायटीसचे ७८ वरून १७६ वर गेले.
डॉक्टरांच्या मते, ही वाढ केवळ आजाराच्या प्रसारामुळे नाही, तर रुग्णांची भीती आणि चाचणीसाठी वाढलेली धावपळ देखील यामागचं एक कारण आहे. फोर्टिस हॉस्पिटलच्या अंतर्गत औषध तज्ज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू यांनी सांगितले की, “पूर्वी चिकनगुनिया हा फारसा आढळणारा आजार नव्हता. आता मात्र, तो सामान्य झाला आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ओपीडीमध्ये वाढली आहे, परंतु गंभीर लक्षणांशिवाय घरीच व्यवस्थापन करता येणं शक्य आहे.”
तसेच होली फॅमिली हॉस्पिटलच्या डॉ. अनुपमा सरदाना यांनी सांगितले की, वृद्ध रुग्णांची स्थिती अधिक गंभीर असून काहींना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत आहे. प्लेटलेट्समध्ये घसरण झाल्यामुळे डेंग्यूचं प्रमाण वाढल्याचेही त्यांनी सांगितले. नायर रुग्णालयातील एका डॉक्टरांच्या मते, मलेरिया आणि डेंग्यू दोन्हीचे गंभीर रुग्ण नोंदवले जात असून, अद्याप कोणताही मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले.
बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी देखील मान्य केलं की, यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाल्यामुळे डासांना पोषक असे वातावरण लवकरच तयार झाले, ज्यामुळे आजारांची संख्या वाढली. नागरिकांनी स्वच्छता राखणे, साचलेलं पाणी टाळणे आणि कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित चाचणी करून उपचार घेणे गरजेचं असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. प्रशासनानेही यासंदर्भात जनजागृती मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित होत आहे.



