मुसळधार पावसाने मुंबई बेहाल, पुढील 24 तास महत्त्वाचे, नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

मुंबई : मुंबई आणि उपनगरात काल(22 जुलै) रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने (IMD) राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात राज्यात आणखी पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD ने २८ जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांनी अंधेरी सबवे बंद असल्याची माहिती दिली. सबवेमध्ये १ ते १.५ फूट पाणी साचले आहे. त्यामुळे गोखले पूल आणि ठाकरे पुलावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. तुर्तास हवाई वाहतुकीवर फारसा परिणाम झाल्याचे वृत्त नाही.
मुंबई लोकलची स्थिती काय?
पावसामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत. मात्र, पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या वेळेवर आहेत. मुंबईत भायखळा, लालबाग, सीएसएमटी आणि चर्चगेट भागात जास्त पाऊस झाला. घाटकोपर आणि आसपासच्या भागात सकाळी १० वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने IMD ने आज (२३ जुलै) रोजी ‘यलो’ इशारा दिला आहे. पुढील २४ ते ३६ तासांत १५० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील तीन तासांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
IMD ने मुंबई, उपनगरे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी मुंबई, ठाणे आणि पालघरच्या काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो. BMC ने मान्सून नियंत्रण कक्ष सुरु केले आहेत. तसेच, पूरग्रस्त भागात जास्त मनुष्यबळ तैनात केले आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, कुर्ला, अंधेरी सबवे, दहिसर आणि मालाड अंडरपासमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.



