BJP अध्यक्षांसोबत जगदीप धनखड यांचं वाजलेलं? उपराष्ट्रपतींंच्या राजीनाम्याबाबत नड्डा काय म्हणाले?

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी सोमवारी रात्री अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. 2022 मध्ये उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेले धनखड यांचा कार्यकाळ 2027 मध्ये संपणार होता, परंतु त्यांनी कार्यकाळ पूर्ण न करताच राजीनामा दिला, त्यामुळे ते असे करणारे देशातील तिसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत. बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीच्या बैठकीत (बीएसी) जे.पी. नड्डा आणि किरेन रिजिजू गैरहजर राहिल्याने धनखड नाराज होते, असा दावा करण्यात येत आहे. यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत
हा थेट अध्यक्षांचा अपमान होता
गेल्या काही दिवसांपासून दोन वेळा बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची बैठक झाली, पण त्याचा कोणताही निकाल लागला नाही. काँग्रेसचे खासदार सुखदेव भगत यांनीही बीएसीच्या बैठकीत जे.पी. नड्डा आणि किरेन रिजिजू न आल्याने प्रश्न उपस्थित केले. त्यांनी उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्याला बिहार विधानसभा निवडणुकीशी जोडले आणि धनखड यांच्या राजीनाम्याची पटकथा आधीच लिहिली गेली होती, असा दावा केला. ते म्हणाले की, सभागृहात जे.पी. नड्डा म्हणाले होते की, ‘माझे शब्द रेकॉर्डमध्ये नोंदवले जातील’, हा थेट अध्यक्षांचा अपमान होता.
भाजपने धनखड यांना त्रास दिला
काँग्रेस खासदार सुखदेव भगत म्हणाले की, “भाजप निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक निर्णय घेते. बिहारची निवडणूक जवळ आहे आणि राज्यसभेचे उपसभापती बिहारचे आहेत.” भाजप हरिवंश यांना उपराष्ट्रपती बनवू शकते, असे संकेतही त्यांनी दिले. त्याचबरोबर भाजपने धनखड यांना त्रास दिला आणि त्यांच्यावर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही सुखदेव भगत यांनी केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी काय म्हटले?
जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर पोस्ट करताना म्हटले आहे की, “दुपारी 12:30 वाजता जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या BAC च्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत सभागृहाचे नेते जे.पी. नड्डा आणि संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह बहुतेक सदस्य उपस्थित होते. थोड्या वेळाच्या चर्चेनंतर समितीची पुढील बैठक संध्याकाळी 4:30 वाजता पुन्हा घेण्याचे ठरले.” रमेश पुढे म्हणाले की, “संध्याकाळी 4:30 वाजता समितीचे सदस्य पुन्हा बैठकीसाठी जमा झाले. सर्वजण नड्डा आणि रिजिजू यांची वाट पाहत होते, पण ते आले नाहीत.” सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगदीप धनखड यांना वैयक्तिकरित्या हे सांगितले गेले नाही की दोन्ही मंत्री बैठकीत येणार नाहीत, असा दावा रमेश यांनी केला.
जे.पी. नड्डा यांनी स्पष्टीकरण दिले
बीएसीच्या बैठकीत न येण्याबाबत राज्यसभा नेते जे.पी. नड्डा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “मी आणि किरण रिजिजू यांनी उपराष्ट्रपतींनी 4.30 वाजता बोलावलेल्या बैठकीत भाग घेतला नाही, कारण आम्ही इतर काही महत्त्वाच्या संसदीय कामांमध्ये व्यस्त होतो, ज्याची पूर्वसूचना माननीय उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाला देण्यात आली होती.” नड्डा पुढे म्हणाले, “याव्यतिरिक्त, मी राज्यसभेत जे बोललो तेच रेकॉर्डवर जाईल, हे विधान विरोधकांच्या टोका-टोकी करणाऱ्या खासदारांसाठी होते, अध्यक्षांसाठी नाही.”



